भास्करगड/बसगड_Bhaskargad_Basgad

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरली आहे ज्याला ‘त्र्यंबक रांग’ म्हणतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी. हरिहर किल्ला हा त्याच्या कातळात खोदुन काढलेल्या पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे मात्र खूप कमी ट्रेकरचे पाय वळतात. 



पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून दिसणारा बसगड aka भास्करगड. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत हा किल्ला येतो.


प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात येणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गानी देशावर येत असे त्यापैकीच गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची निर्मिती झाली. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा तुरुंग म्हणून देखील उपयोग केला गेला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी किमान २ तास लागतात. याच निरगुडपाडा गावातून हरिहर (हर्षगडावर) जाणारा मार्ग आहे. त्र्यंबक-घोटी या मार्गावर खोडाळा मार्ग निरगुडपाडा गाठता येते किंवा मग नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाने देखील येथे पोहोचता येते.


साधारण १ १/२ तासाची डोंगर चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या कातळकड्या समोरील या छोट्या पठारावर येऊन पोहोचतो


निरगुडपाडा गावाच्या अलीकडेच एक कच्चा गाडीरस्ता भास्करगड व फणीचा डोंगर यांच्या मधील खिंडीत जातो. येथून पुढे कच्चा रस्ता सोडून वाट अनेक वळणे घेत भास्करगडावर जाते. पायथ्यापासून भास्करगडाकडे जाणारा मार्ग शोधणे थोडे जिकीरीचे काम आहे त्यामुळे गावातून एखादा वाटाड्या बरोबर घ्यावा. हा किल्ला तसा अल्पपरिचित असल्याने त्याच्या पायवाटा लवकर सापडत नाहीत. शिवाय या किल्ल्याच्या पायथ्याशी खूप घनदाट जंगल आहे. साधारण १ १/२ तासाची डोंगर चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या कातळकड्या समोरील छोट्या पठारावर येऊन पोहोचतो. 


किल्ल्यावर जाण्यासाठी चक्क कातळ खोदून सर्पाकार जिना तयार केलाला दिसतो.

या दगडी जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत

कातळकड्याच्या उजवीकडून वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण भास्करगडाच्या कातळकोरीव पायऱ्याजवळ पोहोचतो. येथून किल्ल्यावर जाण्यासाठी चक्क कातळ खोदून सर्पाकार जिना तयार केलाला दिसतो. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक मोठमोठाले दगड या जिन्यावर वाहून आलेले आहेत. या दगडी जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. या पायऱ्या काळजीपूर्वक चढून गेलो कि समोर येतो किल्ल्याचा अर्धा जमिनीत गाडला गेलेला व काळ्या कातळात कोरलेला दरवाजा. हा दरवाजा जरी अर्धा गाडला गेला असला तरी दरवाज्याच्या दोन्ही बाजूस कोरलेली कमळ पुष्पे अजूनही उत्तम स्थितीत आहेत. या दरवाज्यातून रांगतच आपल्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. 


किल्ल्याचा अर्धा जमिनीत गाडला गेलेला व कातळात कोरलेला दरवाजा

दरवाज्याच्या आता गुहा खोदलेल्या आहेत. बहुदा पहारेकऱ्यासाठी देवड्या असाव्यात

किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे व मंदीराचे अवशेष, बुजलेली पाण्याची टाकी, एक साचपाण्याचा तलाव व दगडात कोरलेली हनुमंताची मूर्ती असे अवशेष पाहायला मिळतात. गड माथ्यावरून जवळच असणारा उतवड व फणीचा डोंगर, हरिहर, श्रीगड (ब्रम्हगिरी), अंजनेरी व ब्रम्हा डोंगर आपले लक्ष वेधून घेतात.


किल्ल्यावरून समोर दिसणारा फणीचा डोंगर, मागे हरिहर aka हर्षगड, त्यामागे अजस्त्र ब्रम्हा डोंगर आणि सर्वात मागे श्रीगड aka ब्रम्हगिरी. तर उजवीकडे अंजनेरीचा डोंगर

पठारावर कोरड्या तलावाकाठी हि बलभीमाची मूर्ती आहे

गडावर राहण्याची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही त्यामुळे भटक्यांनी योग्य पाण्याचा साठा जवळ ठेवावा. पायथ्यापासून गड पाहून परत येण्यास साधारण ५ तासाचा कालावधी लागतो.



@ VINIT DATE – विनीत दाते


Click here for Picasa photo album

Comments

  1. भन्नाट फोटू आणि उपयुक्त माहिती!
    भास्करगड - आडवाटा, अफाट panorama, कातळकोरीव जिना, कातळपोटात खोदत नेलेली मेटे/विवरे - यामुळे संस्मरणीय आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. न्यवाद साई. हरिहर त्र्यंबक रंगेतला एक फेमस किल्ला आहे त्यामुळे हरिहर सोडल्यास बाकी तिन्ही किल्ल्यावर कमीच डोंगर भटके जातात म्हणून ब्लॉग खास या तीन किल्ल्यावर लिहला. बाकी हर्षगडावर बरच लिखाण झालय

      Delete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana