"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पाऊस….. निसर्गाने दिलेलं एक सुंदर असं वरदान. पावसाळा सुरु झाला की सगळा परिसर नवचैतन्याने भरून जातो. जणू सगळीकडे निसर्गाने हिरवा गालीचाच पसरलेला आहे. पावसात निसर्गातला जवळ जवळ प्रत्येक घटक बहरतो आणि फुलतो. आपसूकच मग धुक्यात हरवलेली घाटवाट, डोंगर, गड-किल्ले इत्यादी ठिकाणी भटक्यांची पावले वळायला लागतात. आषाढात पडून गेलेल्या धुवाधार पावसानंतर श्रावण-भाद्रपदातील रिमझिम बरसणा-या सरीमध्ये फिरण्याची मजा तर काही औरच असते. या दिवसात नेहमीच्या वाटा आणि रस्ते आपणांस नवीन वाटू लागतात. डोंगर, द-या, घाट, रस्ते आपले वेगळे रूप दाखवितात. शहर असो वा खेडं श्रावणाची किमया न्यारीच. श्रावणात आभाळही रंग खेळू लागतं. आभाळात ढग असतातच पण श्रावणात सूर्यही थोडा खट्याळ होतो. आपला नेहमीचा भारदस्तपणा सोडून तो ढगांबरोबर लपाछपी खेळू लागतो. मग नकळतच बालकवींची कविता ओठावर तरळते "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे".


गुप्त भीमाशंकर 


पावसाळ्यात सह्य़ाद्रीत फिरायला जी मजा आहे ती कशातच नाही असं मला वाटतं. पावसाळ्यातलं धुकं, सर्वत्र दिसणारी हिरवळ मन मोहून टाकते. हे दृश्य पाहून ह्यापेक्षा सुंदर काहीच नाही असं वाटायला लागतं. काही ट्रेक हे असेच श्रावण-भाद्रपद महिन्यात करण्यासाठी आपण राखून ठेवलेले असतात. 'लोभी' (LoBhi) म्हणजेच लोणावळा ते भीमाशंकर हा असाच एक ट्रेकर्समधे लोकप्रिय असणारा पावसाळी ट्रेक. पण या 'लोभी' ट्रेकसाठी मात्र चांगली दोन-तीन दिवसांची तंगडतोड करावी लागते. आता तुमच्याकडे जर भटकंतीसाठी एकच दिवस हाताशी आहे तर अजिबात निराश होऊ नका. पावसाळी भटकंतीचा पुरेपूर आनंद देणारा तसाच एक दुसरा ट्रेक म्हणजे ‘भोभी’ (BhoBhi) भोरगिरी ते भीमाशंकर.


भोरगिरी ते भीमाशंकर या ट्रेकची सुरवात अर्थातच भोरगिरी या गावापासून होते. पुणे जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात असणाऱ्या खेड (राजगुरूनगर) तालुक्याच्या एका टोकाला अत्यंत टुमदार, छोटंसं आणि निवांत गाव वसलेलं आहे ते म्हणजे भोरगिरी. पुणे-राजगुरूनगर-चास-वाडा-टोकावडे-भोरगिरी असा फक्त ९० कि.मी.चा प्रवास करून भोरगिरी गावात पोहोचता येत. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकर अभयारण्यामधे होतो. पुढे भीमा नदी भोरगिरी जवळून वाहत चासमार्गे राजगुरुनगरला येते. त्यामुळे राजगुरूनगर गाव ओलांडल्यापासून भीमा नदीचे दुथडी भरून वाहणारे पात्र अगदी शेवटी भोरगिरीपर्यंत आपली सोबत करत रहाते. चास मार्गे जाताना वाटेत भीमा नदीवरील बांधलेले आणि पावसाळ्यात तुडुंब पाण्याने भरलेले चासकमान धरणही पाहता येते.


वाडा ते भोरगिरी रस्त्यावर सतत आपली सोबत करणारे भीमानदीचे पाण्याने काठोकाठ भरलेले पात्र


भोरगिरी गावात येताच डांबरी रस्ता संपतो. गावाच्या सुरवातीलाच पुरातन असे कोटेश्वराचे मंदिर आहे. भोभी ट्रेक सुरु करण्याआधी प्रत्येक भटक्यानी थोडा वेळ काढून हे कोटेश्वराचे प्राचीन मंदिर नक्की पहावे. आता त्याजागी नविन सिमेंटचे मंदिर उभारलं जात आहे. आजकाल सगळ्याच जुन्या मंदिरांना जीर्णोद्धाराचा नवीन साज चढत आहे. सिमेंट, मार्बल आणि ऑइलपेंटच्या रंगांचे थर चढवून मंदिरे चकाचक होत असली तरी त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या अनेक जुन्या पुरातन वास्तू, शिलालेख तसेच भिंतींवर असणारे कोरीवकाम नाहीसे होत आहे. भोरगिरी गावात असणारे कोटेश्वराचे प्राचीन मंदिर देखील याला अपवाद नाही. पण पुरातन मंदिराचे अनेक अवशेष व काही मूर्त्या या मंदिराच्या परिसरात आजुबाजूला विखुरलेल्या पाहायला मिळतात. त्यावरुन या मंदिराच्या पूर्वी असणाऱ्या भव्यतेची कल्पना करता येते.


भोरगिरी गावाबाहेर असणारे कोटेश्वर मंदिर


दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंज याने हे कोटेश्वराचे मंदिर बांधले असे म्हणतात. झंज राजाने त्याच्या आयुष्यात एक महान अथवा उत्कृष्ट म्हणता येईल असे काम केले ते म्हणजे गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील हे एक प्राचीन शिवालय आहे. या झंजराजाने बांधलेली शिवालय आणि त्यांचे नदी तीरावरील स्थान आपण प्राथमिक स्वरुपात येथे पाहूयात.


(१) गोदावरी नदीपासून सुरुवात केली तर पहिल्या क्रमांकाला लागते ते त्र्यंबकेश्वरच्या अहिल्यातीर्थाजवळ असणारे भग्न शिवमंदिर

(२) इगतपुरी जवळील वाकी नदीच्या उगमाजवळ असणारा त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याचे शंकराचे शिवालय

(३) बाम नदीकिनारी असणाऱ्या बेलगाव या गावामधील पुरातन शिवालय

(४) धारणा नदीच्या तीरावरील तर्हले येथील शिवालय

(५) कडवा नदीकिनारी असणाऱ्या टाकेद येथील शिवालय

(६) प्रवरा नदीकिनारी असणाऱ्या रतनगड किल्ल्याच्या पायथ्याच्या रतनवाडी गावातील अमृतेश्वर मंदिर

(७) ट्रेकर्सची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावरील मळगंगा नदीच्या उगमावर असणारे हरिश्चंद्रेश्वर मंदिर

(८) मुळा आणि पुष्पावती या दोन नदींच्या दरम्यान खिरेश्वर या गावातील नागेश्वर मंदिर

(९) कुकडी नदीजवळ असणारे कुकडेश्वराचे शिवालय

(१०) मीना नदीवरील पारुंडे गावातले श्री ब्रम्हनाथ मंदिर

(११) घोड नदीवरील वचपे येथील श्री सिद्धेश्वर

(१२) आणि शेवटी भीमा नदीच्या उगमस्थानापासून जवळ असणाऱ्या भोरगिरी येथील पुरातन कोटेश्वर मंदिर.


यातील पहिली ५ मंदिरे नाशिक जिल्ह्यात, नंतरची ३ मंदिरे नगर जिल्ह्यात तर शेवटची ४ मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आणि कोरीवकामाने सजलेली आहेत. त्यामुळे किल्ला पाहिल्यानंतर त्याच्या परीसरातली अशी वेगळी मंदिर नक्कीच पहावीत.


कोटेश्वर मंदिराच्या परिसरात असणाऱ्या कोरीव मूर्त्या


भीमा नदीच्या काठावर कोटेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते आणि त्यामुळे तो डोह पवित्र झाला. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात. कोटेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि मंदिर परिसरात असलेल्या मूर्त्या पाहायच्या. येथे असलेल्या अनेक कोरीव मूर्त्यांमधे एक मूर्ती मात्र थोडी वेगळ्या धाटणीची आहे. येथे गाभाऱ्याबाहेर एक गणेशाची मूर्ती आहे. आता तुम्ही म्हणाल गणपतीची मूर्ती तर जवळ जवळ सगळीकडेच असते मग या मूर्तीत असं काय विशेष आहे. तर हि गणेशाची मूर्ती पाश्चिमात्य पेहेराव केल्यासारखी थोडी निराळीच आहे. मुली स्कर्ट घालतात ना अगदी तशीच या गणेशाच्या वस्त्राची रचना दिसते. आहे की नाही गंमत. हा गणपती चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू तर डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे.


कोटेश्वर मंदिरातील वैशिष्ठपूर्ण गणेश मूर्ती


कोटेश्वराचे दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून फक्त २०० मीटर पुढे असणाऱ्या भोरगिरी गावाकडे आपला मोर्च्या वळवायचा. गावाजवळ येताच उजव्या बाजूला अनेक मोठमोठ्या डोंगरांच्या सानिध्यात एक पिटूकला आणि गोलाकार डोंगर त्याच्या अर्ध्या उंचीवर खोदलेल्या लेण्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. हाच तो भंवरगिरी ऊर्फ भोरगिरीचा किल्ला. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून जरी ६८६ मीटर इतकी असली तरी पायथ्यापासून तो फक्त दीडशे मीटर उठवला आहे. त्यामुळे भोरीगिरी गावाच्या पाठीमागे उभा असलेला हा किल्ला सर करायला जास्तीत जास्त अर्धा तास तर किल्ला पाहून खाली येण्यास एक तासाचा कालावधी पुरेसा आहे. भोरगिरी-भीमाशंकर ट्रेक करणाऱ्या मित्रांनी भोरगिरीचा हा छोटासा किल्ला भीमाशंकर मंदिराच्या मार्गाला लागण्याआधीच बघून घ्यावा. 


भोरगिरी गावातून दिसणारा भोरगिरी किल्ला (डावीकडचा छोटा डोंगर)


भोरगिरी गावातून जाणाऱ्या प्रशस्थ सिमेंटच्या पायवाटेने किल्ल्याकड़े निघावे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूला एक देऊळ लागते, येथे थोडी मोकळी जागा असून छोटी चार चाकी गाडी येथे लावता येते. गावातील देवळातून किल्ल्याच्या मध्यावर खोदलेली गुहा अजूनच जवळ वाटायला लागते आणि गुहेबाहेरील ध्वजस्तंभावरचा भगवा आपल्याला खुणावू लागतो. गावातून लाईटचे खांब गडावरील गुहेत गेले असल्याने त्या खांबांखालून जाणाऱ्या प्रशस्थ पायवाटेने पुढच्या १० मिनिटात गड पायथ्याला पोहोचायचे. या वाटेवर मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या आहेत पण करवंदांचा आस्वाद घेण्यासाठी खास सरत्या उन्हाळ्यात येथे यावे लागते. पावसाळ्यात मात्र येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते. आजूबाजूच्या डोंगरातून कोसळणारे असंख्य नैसर्गिक धबधबे आणि किल्ल्याशेजारून भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या एका प्रचंड मोठ्या ओढ्याचा खळखळाट, सगळचं वातावरण कसं मंत्रमुग्ध करून टाकणारं. 


भोरगिरी गावातून दिसणारा किल्ला व त्यावरील गुहा
किल्ल्याच्या शेजारून भीमा नदीला येऊन मिळणारा मोठा ओढा


गडपायथ्यापासून समोरच दिसणाऱ्या गुहेकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक सरळसोट गुहेकडे जाणारा शॉर्टकट तर दुसरा किल्ल्याचा डोंगर डाव्या हाताला ठेऊन हळू हळू वर चढणारी वाट. ज्यांना डोंगर चढाईची सवय आहे किंवा ज्यांना थोड्या घसरा-घसरीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा शॉर्टकट मस्त. या सरळ वर चढणाऱ्या वाटेवर धोका असा नाही कारण किल्ल्याची उंची खूपच थोडकी आहे पण ज्यांना हा शॉर्टकट टाळायचा आहे त्यांनी शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या असणारी प्रशस्थ पायवाट धरावी. शॉर्टकटने पायथ्यापासून अवघ्या ५ मिनिटात आपण पहिल्या प्रशस्थ गुहेपाशी पोहोचतो.


किल्ल्याच्या पायथ्यापासून दिसणारी गुहा. या थोड्या खड्या चढाईच्या वाटेने ५ मिनिटात गुहेत पोहोचता येते

प्रशस्थ अश्या पायवाटेने किल्ला चढायला सुरवात करताच साधारण दहा मिनिटांनी वाटेला डावीकडे एक फाटा फुटतो. सरळ जाणारी वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर डावीकडे जाणारी पायवाट पायथ्यापासून दिसणाऱ्या गुहेकडे जाते. आपण आधी डावीकडे वळायचे आणि आता गडाचा डोंगर उजवीकडे ठेवत गुहेच्या दिशेने निघायचे. या वाटेवर एकूण तीन गुहा आहेत त्यापैकी पहिल्या दोन गुहांचे ओसरी आणि मुख्य गुहा (गर्भगृह) असे दोन भाग आहेत. ओसरीच्या दोन्ही बाजुला पाण्याची टाकी आहेत. एका गुहेत गाभार्‍याच्या खोलीत देवीची मुर्ती ठेवलेली आहे. पावसाळ्यात या गुहेत कायम गुडघाभर पाणी असते आणि ते पार करूनच देवीचे दर्शन घ्यावे लागते. सगळ्यात शेवटची गुहा मात्र प्रशस्थ असून हीच गुहा आपल्याला गावातून दिसते. भोरगिरीची ही गुहा एकदम प्रशस्त असून मुक्कामासाठी अतिशय योग्य आहे. या गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत. ओसरी चार खांबांवर तोललेली असून येथे अलीकडील काळात बसवलेला नंदी व शंकराची पिंड आहे. याच ओसरीत गर्भगृहासमोर जमिनीत कोरलेले कमळ देखील आहे. मुख्य गर्भगृहात शंकराची पिंड ठेवलेली आहे. गुहेसामोरील मोकळ्या भागात ध्वजस्तंभ असून तिथेही एक भग्न नंदी आहे. पायथ्याच्या भोरगिरी गावातून गुहेतील मंदिरासाठी विजेची सोय केलेली आहे. एकंदरीत खोदकाम पाहता ९व्या शतकाच्या आसपास बौद्धभिक्खुच्या विश्रांती व वर्षावासासाठी खोदलेल्या या गुहा असाव्यात असे वाटते ज्याचे नंतर मंदिरात रुपांतर झाले असावे.


किल्ल्यावरील सगळ्यात मोठी आणि प्रशस्थ गुहा
ओसरीत कोरलेले कमळ
गुहेची ओसरी आणि आत भगवान महादेव


या गुहेतून सभोवताली दिसणारा नजारा मात्र लाजवाब. पायथ्याचे टुमदार भोरगिरी गाव, गावाच्या आजूबाजूला असणारी हिरवीगार भातखाचरे, अधूनमधून रिमझिमणारा पाऊस, हिरवा मखमली अंगरखा परिधान केलेले डोंगर, त्यावरून जमिनीवर झेपावणारे असंख्य धबधबे आणि पायथ्याशी दुथडी भरून वाहणारा ओढा हा सर्व निसर्ग सोहळा या गुहेतून बसून निवांतपणे पाहणे म्हणजे एक स्वर्गातीत अनुभव.


गुहेतून दिसणारे विहंगम दृश

आता गुहा पाहून आपला मोर्चा वळवायचा तो किल्ल्याच्या माथ्याकडे. गुहा डावीकडे (किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला) ठेवत परत थोडे उलटे चालत जायचे आणि तेथून वर चढत जाणाऱ्या पायवाटेला लागायचे. गुहेपासून साधारण १० मिनिटात उरलेला डोंगर चढुन आपण कोसळलेल्या तटबंदीमधून गडमाथ्यावर प्रवेश करतो. किल्ल्याची आज जी काही तटबंदी शिल्लक आहे ती फक्त एवढीच. गडप्रवेश करताच समोर जमिनीच्या पोटात खोदलेले एक धान्यकोठार दिसते. या कोठारावर एक छोटा साचपाण्याचा तलाव आहे. हे समोर दिसणारे अवशेष पाहून उजव्या बाजूला जाणाऱ्या पायवाटेने उर्वरित गडफेरीसाठी निघायचे. गडाचा माथा तसा फारच छोटा आणि साधारण गोल आहे. पायवाटेने पुढे जाताच गर्द झाडीत दोन शिवपिंडी व भैरवाची एक मूर्ती ठेवलेली दिसते. याच पायवाटेने संपूर्ण गडाला फेरी मारता येते. गडफेरी करताना आणखी दोन-तीन पाण्याची टाकी दिसतात. गडाच्या माथ्यावरही हे तुरळक अवशेष पाहून आल्या वाटेने पुन्हा पायथ्याचे भोरगिरी गाव गाठायचे.


गडावरील धान्यकोठार
गडमाथ्यावरील काही मूर्त्या
पाण्याचे टाके. अशी अजून तीन खोदीव पाण्याची टाकी गडावर दिसतात.


पूर्वी भोरगिरी-भिमाशंकर-खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. कल्याण बंदरात उतरणारा माल ह्या मार्गाने घाटावर जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड, तुंगी आणि भोरगिरी (भंवरगिरी) हे किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेली चौकीची किंवा टेहाळणीची ठिकाणं. तसेच भिमाशंकर आणि भोरगिरीचे कोटेश्वर मंदिर ही विश्रांतीची स्थान असावीत. गडावर असणाऱ्या गुहा पाहता हा गड नक्कीच शिवपूर्वकालीन असावा. आता मात्र आपण किल्ल्याच्या इतिहासात जास्त वेळ न गुरफटता भोरीगिरी गावात पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि निघायचं आपल्या मुख्य ध्येयाकडे ते म्हणजे भीमाशंकरकडे.



भोरगिरी गावातून भीमाशंकर फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे. तीन तासांचा सोपा ट्रेक पण हा प्रवास मात्र शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. सह्याद्रीतील ही एक आगळीवेगळी वाट ज्यामध्ये खूप काही जास्त चढण नाही की उतरण नाही. आणि वाटेवर आहे ते भीमाशंकरचं घनदाट अभयारण्य. ही वाट मळलेली व रुंद आहे त्यामुळे वाटाड्याची तशी गरज नाही. पण वेळ वाचवण्याच्या दृष्टीने तसेच पावसाळ्यात बर्‍याचदा ढग उतरत असल्याने वाट नीट सापडत नाही. अशावेळी वाटाड्या घेणे आवश्यक आहे. रस्ता छान वळत वळत भीमाशंकरच्या जंगलात जातो. हि वाट आहे मात्र खूप मस्त. कधी भीमा नदीच्या पात्रातून मोठमोठ्या दगड धोंड्यांनी भरलेली, कधी दाट जंगलातून जाणारी तर कधी अगदी बैलगाडी जाईल एवढी अरुंद पाउलवाट. पावसाळ्यात या वाटेवर दोन-तीन मोठे ओढे आणि अनेक ओहोळ ओलांडावे लागतात. अगदी रमतगमत गेलं तरी भोरीगिरीवरून निघाल्यापासून भीमाशंकर गाठण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.


गावाशेजारून वाहणारा भीमा नदीचा प्रवाह


भोरगिरी गावातून भिमा नदीचा प्रवाह डाव्या बाजुला ठेउन मळलेल्या पायवाटेने आपला प्रवास भीमाशंकरकडे सुरु होतो. गर्द झाडीतून वाटचाल करत एक छोटा डोंगर चढून आपण दोन डोंगरांच्या घळीत येतो. येथून पुन्हा पुढच्या डोंगरावर जाण्यासाठी प्रशस्थ पाय-यांची वाट सुरु होते. दुसरा डोंगर चढल्यावर आपण भोरगिरी भिमाशंकर या कच्च्या रस्त्यावर येतो. येथून मात्र पठार सुरु होते. या प्रवासात तुम्हाला भीमाशंकरच्या जंगलात आढळणारे शेकरू हमखास दिसेल. फक्त जंगलात फिरताना तुम्ही शांत राहायला हवे आणि तुमची नजर शोधक हवी. भीमाशंकर म्हणजे तर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकरू (इंडियन जायंट स्क्विरल) या मोठ्या खारींचे माहेरघर. सदाहरित, निम सदाहरित जंगलात शेकरूचे वास्तव्य असते. उंच झाडावरच शेकरू घर बांधते व अगदी माकडासारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत ते आपला प्रवास करते. आकाराने खारुताईपेक्षा बऱ्यापैकी मोठे असले तरी शेकरू प्रचंड लाजाळू प्राणी आहे. अश्या या सर्वांगसुंदर शेकरूसाठी तरी भीमाशंकरसारखी सदाहरित जंगले वाचवणे खूप गरजेचे आहे.


भोरगिरी गावातून निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील झाडी
दगडी फरसबंदी वाट
भूरभूर पावसात पठारावरची चाल

गावातून निघाल्यापासून तासाभरात आपण मोठय़ा पठारावर येतो. आता मात्र भिमा नदीचा एक मोठा प्रवाह आपला मार्ग अडवतो. हा प्रवाह उथळ असला तरी पावसाळ्यात येथे पाण्याला जोर असतो. अशावेळी रोप बरोबर बाळगावा. हा प्रवाह ओलांडल्यानंतर साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर वाटेला दोन पायवाटा फ़ुटतात. सरळ जाणारी मोठी कच्ची पायवाट थेट भिमाशंकरला जाते तर वाटेच्या डाव्याबाजुला असलेला भिमा नदीला मिळणारा प्रवाह ओलांडून एक छोटी अस्पष्ट पायवाट दाट जंगलात घुसते. हि छोटी पायवाट तुम्हाला थेट गुप्त भिमाशंकरला घेऊन जाते. त्यामुळे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने भीमाशंकरकडे जाताना या वाटेने जावे तर परतीच्या प्रवासात समोरून येणारी प्रशस्थ पायवाट धरावी. डावीकडे गुप्त भिमाशंकर मार्गे जाणारी पायवाट घेण्यामागचे दुसरे कारण म्हणजे या वाटेवर लागणारे एक सुंदर बांधीव टाके किंवा पुष्करणी. नितळ पाण्याने काठोकाठ भरलेली हि पुष्करणी पटकन सापडण्यासाठी मात्र वाटाड्या बरोबर घेणे आवश्यक आहे.


पठारावर आल्यानंतर भीमानदीचा हा मोठा प्रवाह ओलांडावा लागतो 
हा प्रवाह तसा उथळ आहे मात्र खूप पाऊस झाल्यास पाण्याची पातळी लगेच वाढते
पाण्याचे टाके / पुष्करणी


पुष्करणी पाहून तिथूनच पुढे जंगलात घुसणाऱ्या पाउलवाटेला लागायचे. येथून साधारण १५ मिनिटे वर चढत गेल्यावर आपण भिमाशंकरहुन गुप्त भिमाशंकरला जाणार्‍या वाटेवर पोहोचतो. भोरगिरी ते भीमाशंकरच्या वाटेवर पहिल्या आणि या शेवटच्या टप्प्यात गर्द वनराई आहे. उंचच उंच झाडांमुळे तयार झालेला हा घनदाट जंगलाचा पट्टा जरा गूढच वाटतो. इतकी गर्द झाडी असलेलं जंगल जिथे दिवसासुद्धा सूर्यकिरण पोहोचू शकत नाहीत. ऐन वर्षा ऋतूत आलात तर येथे असंख्य रानफुले आणि भूछत्रे फुललेली असतात. मात्र धुके, पाऊस आणि शेवाळामुळे निसरडी झालेली हि वाट भर पावसाळ्यात चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वाटाड्या बरोबर असलेला बरा.


गुप्त भीमाशंकर येथे शॉर्टकटने पोहोचण्यासाठी हे जंगल पार करावे लागते
गुप्त भीमाशंकर परिसरात खूप घनदाट जंगल आहे त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता आहे


जंगलातून बाहेर पडताच समोर खळाळत वाहणारा एक मोठा प्रवाह दिसतो. हा प्रवाह म्हणजेच भीमा नदी. भीमाशंकर येथे मुख्य मंदिराच्या थोडे अलीकडे एका कुंडात प्रकट झालेली भीमा नदी पुढे लुप्त होते आणि पुन्हा भीमाशंकर मंदिराजवळ प्रकटते. मंदिरापासून पुन्हा खळाळत वाहात जाते आणि दाट जंगलातील तब्बल दोन किमीचे अंतर कापून एका धबधब्याचे रूप घेते. हाच तो प्रवाह. हा धबधबा जेथे पडतो तेथे एक नैसर्गिक पिंड तयार झाले तेच हे गुप्त भीमाशंकर. या प्रवाहात ५ मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपण गुप्त भीमाशंकरजवळ पोहोचतो. पावसाळ्यात या प्रवाहाला जास्त पाणी असल्यास प्रवाह ओलांडण्यासाठी रोपची आवश्यकता भासते. त्यामुळे ५० ते १०० फ़ुटी रोप बरोबर बाळगणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. 


भीमेचा मोठा प्रवाह. ह्याच प्रवाहाचा धबधबा होऊन गुप्त भिमाशंकर येथे पिंडीवर पाणी पडते
गुप्त भीमाशंकर येथील पाण्याचा प्रवाह
गुप्त भीमाशंकर 


गुप्त भिमाशंकर पाहुन पुढे मळलेल्या पाउलवाटेने भिमाशंकर मंदिराकडे निघायचे. येथून साधारण अर्ध्या तासात आपण भीमाशंकर मंदिरापर्यंत पोहोचतो. या मार्गावर आता ठीकठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावलेले असल्याने वाट चुकण्याची शक्यता तशी कमीच आहे. गुप्त भीमाशंकर येथून साधारण १० मिनिटे चालत जाताच साक्षी विनायकाचे छोटेसे मंदिर लागते व पुढे वाटेला एक T जंक्शन येते. येथे डावीकडे जाणारी वाट भीमाशंकर मंदिराकडे जाते तर उजवीकडील वाट भोरगिरीवरून आलेली आहे. भोरगिरी-भीमाशंकर रस्त्यावर जर तुम्ही गुप्त भीमाशंकरमार्गे आला नाहीत तर या वाटेने गुप्त भीमाशंकर गाठता येते. आपला मोर्च्या मात्र डाव्या वाटेने भीमाशंकर मंदिराकडे वळवायचा. या मार्गावर आपल्याला अचानक माणसांची वर्दळ वाढलेली जाणवते आणि भीमाशंकराचे मंदिर आता जवळच आले आहे याची पावती मिळते. आत्तापर्यंतच्या पायी प्रवासात आपल्या नजरेला पाहायला मिळालेलं स्वच्छ जंगल अचानक लेज, कुरकुरे, बिस्कीट यांच्या रॅपर्सनी भरून गेलेले दिसते. आत्तापर्यंत प्रवाहांना असणारा फेसाळ, दुधी रंग अचानक बदलून आपल्या अवतीभवती असणारा प्लॅस्टिकचा कचरा, फुलं, मैलामिश्रित घाण बरोबर घेऊन वाहताना दिसायला लागतो. अन् आपण ओळखायचं की, भीमाशंकर आता अगदी हाकेच्या अंतरावर आलंय. आतापर्यंत निसर्गसंपन्न असलेली ही पायवाट आता मात्र अचानकच नकोशी वाटायला लागते. 



प्लॅस्टिकचा कचरा ही भीमाशंकर अभयारण्यातील एक मोठी समस्या आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी केलेला प्लॅस्टिकचा कचरा मंदिरामागील बाजूस फेकला जातो. हा कचरा, वारा आणि पावसामुळे अभयारण्याच्या इतर परिसरात पसरतो. हा कचरा काही देवाची देण नाही. आपल्यासारख्या कृतघ्न माणसाचंच हे काम आहे. निसर्गात येऊन निसर्गाची एवढी अवहेलना का करतो माणूस. हे सर्व पाहून मन विषण्ण होत पण या सगळ्याकडे तूर्तास दुर्लक्ष करून मंदिराजवळ पोहोचायचं. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. त्यामुळे साहजिकच येथे वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक व पर्यटक येत असतात. महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा आणि श्रावण महिन्याच्यावेळी तर येथे दर्शनासाठी तासनतास रांगा लागलेल्या असतात. आपण मात्र त्या गर्दीत न शिरता लांबूनच शिवाचं दर्शन घ्यायचं आणि परतीच्या वाटेवर निघायच.


अरर किती हा कचरा! माणसा कसं होणार तुझं
भीमाशंकर मंदिर


स्वतःचे वाहन असेल तर भोरगिरी - भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक एका दिवसात करता येतो. सकाळी ८ वाजता भोरगिरी गावात पोहोचल्यास कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला, गुप्त भिमाशंकर आणि भिमाशंकर मंदिर ही ठिकाण पाहण्यास दुपारचे साधारण २ वाजतात. दुपारचे जेवण उरकून भोरगिरी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केल्यास संध्याकाळी ६ पर्यंत पुन्हा भोरगिरी गाव गाठता येते. वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास हा ट्रेक एका दिवसात सहज करता येईल. मात्र बरोबर विजेरी (टॉर्च) बाळगणे आणि वाटाड्या घेणे आवश्यक आहे कारण परतीच्या प्रवासात अंधार होण्याची शक्यता असते. 


ज्यांना फक्त भोरगिरी - भिमाशंकर एवढाच ट्रेक करायचा आहे त्यांनी खेड (राजगुरुनगर) बस स्थानकावरून सकाळी ८ वाजता भोरगिरीसाठी सुटणारी बस पकडावी. तसेच खेड ते भोरगिरी जीप वाहतूक देखील उपलब्ध आहे. कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला, गुप्त भिमाशंकर आणि भिमाशंकर मंदिर ही ठिकाण पाहून भीमाशंकर बसस्थानकावरून परतीचा प्रवास करावा. किंवा चालकाकरवी भोरगिरी गावातील वाहन टोकावडेमार्गे भीमाशंकरला बोलवावे. 


या ट्रेकसाठी शक्यतो श्रावण महिना टाळावा कारण भीमाशंकर हे प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असल्यामुळे श्रावण महिन्यात येथे अतोनात गर्दी असते. दुसरी महत्वाची सूचना म्हणजे या ट्रेकमधे काही ठिकाणी भीमा नदीचा प्रवाह ओलांडावा लागतो त्यामुळे पाण्याची पातळी, प्रवाहाचा जोर व पावसाचे प्रमाण या गोष्टी ग्राह्य धरूनच पाण्यात उतरावे. जवळ एक ५० फ़ुटी रोप सोबत बाळगल्यास उत्तम. 

तर पावसाळ्यात आवर्जून करावा असा हा सह्याद्रीमधला एक नितांत सुंदर ट्रेक. पण हा ट्रेक करत असताना भीमाशंकर अभयारण्यातील निसर्ग, जंगल आणि वन्यप्राणी यांना आपल्या मानवी हस्तक्षेपाचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकाने अवश्य घ्यावी. 



@ VINIT DATE – विनीत दाते


भोरगिरी-भीमाशंकर या ट्रेकचे सर्व फोटो एकत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 





ट्रेकिंग/भटकंती करताना:



  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 



“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.






Comments

  1. Vinit very nice information great, keep it up.
    Congratulations

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद पावशेजी!

      Delete
  2. mastach....as always!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अजित! तुमची कमेंट प्रत्येक ब्लॉगपोस्टवर असतेच. खूप छान वाटतं तुमची प्रतिक्रियावाचून

      Delete
  3. खूपच छान माहिती

    ReplyDelete
  4. खुप छान मस्त चला तर...येताय ना....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! माहिती वाचून नक्कीच फिरून या

      Delete
  5. Atishay uttam lekhatan, Suchana dekhil chan dilya ahet
    Vatechi uttam mahiti tasech chaya chitrikaran padopadi dilyane vachnyachi ustukata tikun rahate

    ReplyDelete
    Replies
    1. सौरभ इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  6. मस्त रे विनीत

    ReplyDelete
  7. I felt i was on trek while reading this post.
    Thanks for sharing keep blogging..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अमोल! ट्रेक व ठिकाणांची इत्यंभूत माहिती जशी फिरलो तशी देण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न तुम्हाला आवडला हे वाचून आनंद वाटला

      Delete
  8. ऐक नंबर दाते

    ReplyDelete
  9. Extremely informative blog vinit, very nice.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दीपक भाऊ!

      Delete
  10. विनीत दादा, सविस्तर लिखाण दरवेळे प्रमाणे. नादखुळा फोटो.

    ReplyDelete
  11. Replies
    1. धन्यवाद श्रीहरी

      Delete
  12. धन्यवाद रे मुकुंदा!

    ReplyDelete
  13. अप्रतिम वर्णन

    ReplyDelete
  14. विनीत सुंदर झालाय लेख!

    ReplyDelete
  15. अगदी तपशीलवार माहिती 👌👌

    मस्त लिखाण...👍👍

    ReplyDelete
  16. खूप छान माहिती! भोरगिरी ते भिमाशंकर चार चाकी गाडी जात नाही का? जर गाडी ने भोरगिरी ला उतरले तर परत जाण्यासाठी driver ला भिमाशंकर ला बोलवावे लागते का?

    ReplyDelete
  17. आवडीचें पदार्थे जसे पावसाळ्यात मध्ये गरम खेकडा भजी बटाटे वडे त्याचा खमंग असा सर्वत्र दरवणारा वास तळलेली मिरची चा ठसका तरी दार मिसळ आणी मस्त असे भाजले मक्याचे कणीस त्यावर लिबू मीठ मसाला हे सगळे बगुन तोंडाला जसे पाणी सुटते .कधी एकदाचा त्यांच्या वर ताव मारतो . असे सगळे होते जेव्हा
    . विनीत दादा तुझा ट्रेक ब्लॉग वाचतो तेव्हा ट्रेक चे फोटो आणी अतिशय बारकाव्या सहित माहिती वाचून लगेच तिकडेच निगावे असे वाटू लागते . भोभि चा ट्रेक मस्त झाला .तुमचे खरेच खूप आभार .

    ReplyDelete
  18. विनितजी नेहमीप्रमाणेच शब्दांकन अप्रतिम आणि फोटोग्राफी सुंदर. खरं तर हा ट्रेक मी नाही केलेला. पण वर्णन वाचून आणि फोटो पाहून असे वाटते कि खरंच आपण त्या भागात आहोत कि काय असा भास नक्कीच होतो. प्रत्येक गोष्टीचं बारकाईने केलेले निरीक्षण, तेथील मूर्तींचा इतिहास, त्यांची मूळ नावे, नवीन ट्रेकर्स ला जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि ते शब्दात मांडण्याची खूप सुंदर कला छायाचित्रासहित तुम्हाला अवगत आहे. नक्कीच तुमच्याबरोबर ट्रेकिंगसाठी यायला आवडेल.

    ReplyDelete
  19. व्वा, मस्तच विनीत! आख्खा भटकंतीमार्गच डोळ्यांसमोर उभा केलास.. धो-धो वाहणारे ते ओढे, दोराला धरून जाणारं ते मंडळ नि गुप्त भीमाशंकरचा तो जोशपूर्ण प्रवाह.. सारंच नजरेसमोर उभं राहिलं. तो अप्रिय कचरा देखील.. खरं तर प्रत्येक भाविकानं आपला कचरा बरोबर नेला तर किती छान बरं! असो, असा येईल तो दिन सुदीन म्हणायचा!😂😂

    ReplyDelete
  20. विनीत दादा प्रवास वर्णन नेहमी प्रमाणे भन्नाट .. वाचताना स्वतः अनुभव घेतोय हा feel नक्की येतो 🙏👍👌👌

    ReplyDelete
  21. मला 12 शंकराचे शिवालय मंदिरे यांचे पत्ता पाहिजेत मला सेंड करा

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana